(१) या आयतीमध्ये अल्लाहने सर्वांत प्रथम हे सांगितले आहे की ईमान (श्रद्धा) आणि तकवा (अल्लाहचे भय राखून केलेले आचरण) ही अशी बाब आहे की ज्या वस्तीचे लोक तिचा अंगिकार करतील तर त्या वस्तीवर अल्लाह आकाश व धरतीचे सुख-समृद्धीचे, धन-संपत्तीचे दरवाजे उघडतो. अर्थात गरजेनुसार आकाशातून पाऊस पाडतो आणि जमिनीला त्याद्वारे सिंचित करून शेतीचे उत्पन्न वाढवितो, परिणामी विकास आणि संपन्न अवस्था उदयास येते. याउलट खोटे ठरविणारे आणि अल्लाहचा इन्कार करण्याचा मार्ग पत्करणारे जनसमूह अल्लाहच्या प्रकोपास पात्र ठरतात, मग रात्री किंवा दिवसा केव्हा प्रकोप कोसळेल हे कळून येत नाही, परिणामी सुखा-समाधानाने आबाद असलेली वस्ती एका क्षणात निर्जन व नामशेष होते. यास्तव अल्लाहच्या प्रकोपापासून निर्धास्त राहू नये. या बेफिकीरीचा परिणाम फक्त विनाश आहे. याखेरीज आणखी काही नाही.