(१) कलमची शपथ घेतली, जिचे एक महत्त्व यासाठी आहे की याद्वारे वर्णन आणि भाष्य केले जाते. काहींच्या मते यास अभिप्रेत तो खास कलम होय, ज्याला अल्लाहने सर्वांत प्रथम निर्माण केले आणि त्यास भाग्य लिहिण्याचा आदेश दिला. यास्तव त्याने शेवटपावेतो घडणाऱ्या सर्व गोष्टी लिहिल्या. (तिर्मिजी, तफसीर सूरह नून वल कलम आणि अलबानी यांनी यास उचित म्हटले आहे.)
(१) ‘खुल्के अज़ीम’शी अभिप्रेत इस्लाम धर्म किंवा पवित्र कुरआन होय. अर्थात तुम्ही त्या पद्धतीवर आहात, ज्याचा आदेश तुम्हाला अल्लाहने कुरआनात किंवा इस्लाम धर्मात दिला आहे किंवा यास अभिप्रेत ती सभ्यता, शिष्टाचार, नरमी, स्नेहशीलता, विश्वस्तता, सचोटी, गांभीर्य, श्रेष्ठता आणि इतर नैतिक गुण आहेत. हे गुण पैगंबर (सल्लल्लाहु अलैहि वसल्लाम) यांच्या चारित्र्यात त्यांच्या पैगंबर होण्यापूर्वीच होते आणि पैगंबर झाल्यानंतर ही गुणवत्ता आणखी उंचावली व विस्तृत झाली. यास्तव जेव्हा हजरत आयेशा (रजि.) यांना पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या चारित्र्याबाबत विचारले गेले तेव्हा त्यांनी फर्मावले, ‘‘काय तुम्ही कुरआन वाचले नाही?’’ (मुस्लिम, किताबुल मुसाफिरीन, बाबु जामेअ सलातिल लैले व मन नाम अन्हु मरेज) हजरत आयेशा यांचे उत्तर ‘खुल्के अज़ीम’च्या वर उल्लेखित दोन्ही अर्थांनी युक्त आहे.